Tuesday, July 14, 2020

एका सांजवेळी



एका सांजवेळी
सहजच येऊन भेटशील का
बोलत बसावं वाटतं खूप
सगळं एकूण घेशील का.

डोळे भरून तुलाच
बघावं वाटतं
नबोलता सारे 
मनातलं जाणशील का.

दुरावा हा क्षणात सोडून
एकवेळ येऊन भेटशील का
अश्याच एका संध्याकाळी
हातात हात घेऊन बसशील का.


एका सांजवेळी तू
सहज येऊन भेटशील का!


- भावेश सोनार

Friday, July 10, 2020

कधीतरी माझ्या डोळ्यात बघ



कधीतरी माझ्या डोळ्यात बघ
तुला सापडत का काही
नको म्हणत असतांना देखील
गुंतत गेलो तुझ्यात
शोध घेतांना स्वतःचा
बघ विरघळलोय मी


- भावेश सोनार

Saturday, June 6, 2020

शिव राज्याभिषेक

     ढोल ताशे चौघडे वाजू लागलेत, मोठी पहाट झाली, सूर्याचं किरणं ही हा आजचा क्षण बघण्यास आतुर झालीत, चौघडा दनानु लागला, मंगल वाद्यांचे निनाद रायगडावर निनादु लागलेत, सगळ्यांचीच तारांबळ उडाली आज राजे छत्रपती होणार!
     गागाभट्टानी अभिषेकप्रयोगास प्रारंभ केला, पंचामृतस्नान महाराजांना करण्यात आलं, नंतर अभिषेक सुरू झाला. गंगा, यमुना, सिंधू सारख्या सप्तगंगाच्या धारा महाराजांच्या मस्तकावरून अंगाखांद्यावर घळघळू लागल्या. सप्तगंगा आनंदी झाल्या, ह्या सगळ्या नद्या महाराजांना काय म्हणाल्या असतील? सप्तगंगा हर्षभरे खळाळल्या. समुद्रोकस्नान झाले, उष्णोदकाचे कलश महाराजांच्या मस्तकावर रिते होऊ लागले. काशांच्या पात्रता भरलेल्या तुपात महाराजांनी आपले मुखावलोकन केले. नंतर शुभ्रवस्त्रे व अलंकार धारण केले. शस्त्र धारण केली. महाराज सिंहासनारोहनासाठी निघाले, आऊ साहेबांना नमस्कार करावयास आले. सुवर्ण दंड घेतलेले अष्ठप्रधान यांच्यासह राजे राजसभेत प्रवेशले. राजसभेत उत्सुक मनाने उभे असलेले हजारो लोक रयत यांची मने आनंदाने भरून आली.
     राजे एका हातात बलदंड असा राजदंड अन् दुसर्या हातात भवानी तलवार पेलून सिंहाप्रमाणे धीमी, ऐटदार पावले टाकीत, आपली तीक्ष्ण तेजस्वी नजर चौफेर फिरवीत, हलकेच पापण्या मिटून, अगदी नकळत अशा स्मिताने झडणार्या मुजर्यांचा स्विकार करीत येतायत. सोबतच स्वराज्याचे पहिले राजपुत्र, धाकल धनी शंभूराजे आपल्या पित्याचे अनुकरण करीत दमदार पावले टाकीत सिंहासन जवळ करीत आहेत. सोयरा माँसाहेब अखंडलक्ष्मीअलंकृत अशा वैभवलक्ष्मी महाराज्ञी शोभतायत, आऊ साहेबांच्या डोळ्यात सुखाचे अश्रू थांबत नाहींयत. 
    दर्याखोर्यातील काटक मावळे एकत्र करणार्या, निबिड अन् बेलाक अशा सह्याद्रीत गडकोट बांधणार्या, जिंकणार्या शिवबापासून, दिल्लीपती औरंगजेबाचा त्याच्याच दरबारात पाणउतारा करणार्या, कारतलबखान, फत्तेखान, शायिस्तेखान, अफजलखान, बहादुरखान अशा एकेक बलाढ्य योध्द्यांचे पारिपत्य करणार्या, रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणार्या शिवाजी महाराजांपासून तो थेट बत्तीसमणी सिंहासानाचे चक्रवर्ती सम्राट होइपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज होईपर्यंत पाहणार्या लोकांचे शेले मुजरा घालताना आपसुक डोळ्यांशी गेलेत आणि आठ सिंहांच्या सिंहासनावर एक मराठ्यांचा नरसिंह मुजोर परक्यांचे, ईंग्रज, डच, मोगल, आदिल, पोर्तुगालांचे मुजरे, कुर्निसात स्वीकारीत 
सिंहासानारुढ होणारंय
     महाराज सिंहासनाच्या समोर आलेत, सिंहासनाचा एकूण थाट अप्रतिम. आपला एक गुडघा टेकवून राजेंनी त्या बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनाला मस्तक लववून वंदन केले. नंतर पूर्वाभिमुख उभे राहिले. नगारे, चौघडे, शिंगे, हलग्या, ताशे तमाम वाद्ये आणि तोफाबंदुका सुसज्ज झाल्यात. सर्वांचे डोळे महाराजांच्या मूर्तीवर खिळले. स्वराज्याचा तो न भूतो न भविष्य, सुवर्ण, अमृताचा, याची देही याची डोळा बघावा अस तो क्षण उगवला, गागा भट्टानी वेदमंत्र म्हणायला घेतले. त्या प्रचंड वेदघोषात महाराज सिंहसनाला पदस्पर्श न होऊ देता सिंहासनावर स्थानापन्न झाले! आणि एकच कल्लोड उडाला, सनई, चौघडे, ताशे यांनी धुमधडाका उडविला. तोफ्याच्या बंदुकानी दाही दिशा दणाणून सोडल्या, सभाजनांनी सुगंधी फुलांची, अक्षदांची, लाह्यांची महाराजांवर अविरत वृष्टी केली. हजारो कंठातून एकच एक गर्जना उठली
"छत्रपती शिवाजी महाराज की जय!"
"छत्रपती शिवाजी महाराज की जय!" 
"छत्रपती शिवाजी महाराज की जय!" 

टाळ्या कडाडल्या तोफा दणाणल्या स्वराज्याच्या सर्वच्या सर्व किल्यांवर याचवेळी तोफांचा दणदणाट सुरू झाला, सारे स्वराज्य आनंदून गेले. या जयजय काराणे दिल्लीच्या कानठळ्या बसल्या! विजापूर बधिर झाले! फिरंग्यांची झोप उडाली! दक्खनच्या दौलतीच्या नौबती सर्वदूर ऐकू गेल्यात. राजसभा देहभाव विसरली होती, कसं काय आणि कोणत्या शब्दात सांगावं?
      सर्व स्त्री वर्गाने महाराजांना ओवाळले व आपला आदर, प्रेम, कौतुक, व आशीर्वाद व्यक्त केला. नंतर मोत्यांची झालर लावलेल, रत्नजळीत राजछत्र गागाभटांनी राजेंच्या मस्तकावर धरले! आणि गागाभटांनी उच्च स्वरांत घोषणा केली, शिवाजीराजे आज छत्रपती झाले..! 
राजा शिवछत्रपती ! प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस महाराज सिंहासनाधिश्वर राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय! जय! जय!


इथल्या रयतेच्या मनातला उत्साह आणि तोफेची भांडी अवघ्या पृथ्वीला दणाणून सांगत आहेत

"आमचं राजं छत्रपती झालं !!! 
आमचं राजं छत्रपती झालं !!! 
आमचं राजं छत्रपती झालं !!

Thursday, May 7, 2020

पाषाणात कोरलेला तू बुद्ध होतीस!

उदास झालेल्या या मनात
भावनांनी गजबजलेल गाव होतीस

भकास संध्याकाळी

वाऱ्याची झुळूक होतीस

तुझ्या डोळ्यातील निरागस भाव

पाषाणात कोरलेला तू बुद्ध होतीस!

-भावेश सोनार



Sunday, March 8, 2020

जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन


शिवमंत्र परस्त्री माते समान
तिच्यात आहे आपलीच आई,
गुणगान गावे तेवढे थोडेच
ती सावित्री माई आणि रमाई!!

- भावेश रतिलाल सोनार





द्या वागणूक मायेला
शुभेच्छा नको फक्त दिखाऊ,
आदर करा मनो भावे
तिच्यातच आहे जिजाऊ!

- भावेश रतिलाल सोनार



Saturday, November 30, 2019

शिवराय असे शक्तीदाता!


किती अडचणी देशील आयुष्या
मी ही तयारच आहे आता,
नुसत्या नावानेचअंगात बळ येत
शिवराय असे शक्तीदाता

- भावेश सोनार


Thursday, November 28, 2019

सत्यशोधक बा ज्योतिबा




"सत्यशोधक बा ज्योतिबा"


तळपता सूर्य तू
काळोखात मशाल बा,
पिढ्यांचा अंधार सम्पविला
सत्यशोधक तू ज्योतिबा

लकवा असतानाही बापा
तू डाव्या हाताने सत्यधर्म लिहिलास,
तुझ्या ह्याच लेखाने
कित्येक पिढ्या मुक्तकेल्यास

तू आयुष्यभर आम्हा
लेकरांसाठी लढला,
पण भीतीने कधी
मागे नाही हटला

जगण्याचा हक्क नाकारणारे
हे पाखंडी लोक आणि धूर्तच त्यांचे कर्म,
यांना काय कळणार
तुझा सत्यशोधक धर्म

जमणार आहे का ह्यांना
तुझे विचार जपणं,
तुझा विचारांचा वारसा
पिढ्यान पिढ्या चालवणं

याच तुझ्या ज्योतीची
आज मशाल झालीय,
तू दाखवलेल्या सूर्याने
इथली काळरात्र संपलीय

ह्याच ज्योतीतून
कित्येक सवित्र्या मुक्त केल्यात,
गुलामगिरी नष्ट करून
स्वतःच्या पायावर उभ्या केल्यात

बा ज्योतिबा

तुझा तो सत्यधर्म
राज्यघटनेत उतरला,
तुझा हा विचारांचा वारसा
आम्हीही पुढं पेलू बा

जगण्यास उमेद आणि लढण्यास बळ
तुझ्याच विचारातुन येते बा,
सत्यशोधक तू कायम
स्मरणात आहेस ज्योतिबा


- भावेश रातिलाल सोनार

बा ज्योतिबा

बा ज्योतिबा...

निबिड अंधारातून दूर करणारा तळपणारा सूर्य तू..
काळोखातली  मशाल होऊन वाट दाखवत अन चालत गेलास,
आणि झालास सत्यशोधक...

तू लिहिलास सार्वजनिक सत्यधर्म, अर्धांग झाल्यावरही,
आमच्या बुद्धीला लागलेला लकवा घालवण्यासाठी, कैक पिढ्या मुक्त करण्यासाठी...

बेफिकीर होऊन बेडरपणे बाप होऊन,
आम्हा लेकरांसाठी लढताना तू भ्यायला नाहीस कधीही,
मारेकरी सुद्धा आपले केलेस...

जगण्याचा हक्क नाकारणारे हे पाखंडी धूर्त बगळ्यासारखे,
यांना काय कळणार तुझा सत्यशोधक धर्म अन त्यात सांगितलेलं मुक्त जगण्याचं वर्म....

तुझ्या विचारांचा वारसा पिढ्यानपिढ्या चालवणं,
 तुझे विचार जपणं हे खायचं अन बेंबीवरून हात फिरवण्याचं काम नाहीय हे कळलंय त्यांना कधीच....

तू लावलेल्या वातीची ज्योत अन त्या ज्योतीची मशाल झालीय आता..
ती मशाल आता बुरसटलेल्या अंधारात तळपुन वाट दावतेय सत्याची, सूर्य बनून अगदी तुझ्यासारखीच.....

आज कित्येक सावित्री मुक्त झाल्यात, स्वतःच अस्तित्व सिद्ध करताहेत
तु घेतलेल्या पवित्र्यामुळे अन तिने घेतलेल्या शेणचिखलामुळे....

तुझा तो सत्यधर्म आजही राज्यघटनेत आहे, अन तो जगण्याचा प्रयत्न अन तुझी ती धुरा सांभाळण्याचा एक प्रयत्न मी नक्कीच करेल एक सत्यशोधक म्हणून....

जगण्याची ही उमेद अन संघर्षासाठी लागणार बळ,अन ऊर्जा या जीवाला तुझ्याच पासून मिळते, अन तू वाहतोस आजही नसानसातून ...
तू असाच तेवत राहा हे सत्यशोधक महासुर्या...

Thursday, September 5, 2019

बाबा

बाबा
5 सप्टेंबर शिक्षक दिन
5 सप्टेंबर आला म्हणजे उत्सुकता असायची शिक्षक दिनाची आणि शिक्षक दिन म्हणजे नावालाच पण मी या दिवसाची खास वाट बघायचो याच कारण म्हणजे माझ्या बाबांचा (आजोबांचा) जन्मदिवस आणि बाबा शिक्षक होते. तर मला लहाणपणा पासूनच ते अगदी आता पर्यंत सुद्धा या गोष्टीच कुतूहल आहे की बाबा शिक्षक आणि नेमका शिक्षक दिनाच्या दिवशीच बाबांचा वाढदिवस. याचं मला खूप नवल की नेमका शिक्षक दिनाच्या दिवसाचाच बाबांचा जन्म. याच मला आचर्य वाटायचे कारण बाबा मास्तर होते.
मला आठवतंय लहानपणी अंगणवाडीत मी बाबांशिवाय जात नव्हतो. बाबा मला रोज तिथं नेऊन सोडायचे आणि घ्यायला पण यायचे. आणि मम्मी ने जरी डब्बा दिलेला असला तरी बाबांकडून रोजचा खाऊ ठरलेलाच असायचा. लहानपाणी लाड खूप केलेत बाबांनी. लहानपणी कधी कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केला की मम्मी सरळ बाबांच्या पलंगावर नेऊन बसवायची, तिथं बसलो म्हणजे हलायला पण जागा नाही. मारायचे नाही पण भीती. रागवायचे तेवढ्या पुरता पण कधी मारलं नाही. जेवढा आदर होता तेवढाच दरारा पण, बाबांना सगळेच घाबरायचे.
शाळेत जातांना रोज बाबांकडून एक रुपया घ्यायचो. आणि तो दिवसभर पुरवायचो मी. शाळा भरण्याआधी २५ पैश्याच्या गोळ्या, मधल्या सुट्टीत २५ पैश्याच्या, जेवणाच्या सुट्टीत २५ पैश्याच्या, घरी येताना २५ पैश्याच्या. असा रुपयाचा तो ढोकळा मी पूर्ण दिवस पुरवायचो. आणि बाबांनी पण कधी रुपया द्यायला नकार दिला नाही. मी रुपया मागितला आणि बाबांनी नकार दिला असं कधीच झालं नाही. आणि आताच्या शंभर रुपयांच्या नोटेला सुध्या त्या रुपयांची सर नाही.
बाबांना नेहमी वाटायचं की मी मोठं होऊन नाव कमवाव, चांगलं शिकावं, चांगलं वागावं. सगळ्यांनी माझं नाव काढावं. ते मला सतत सांगत असत. अभ्यास केला तर मोठा होशील, मान मर्यादा, प्रतिष्ठा भेटेल. आणि मी सगळं ऐकायचो ही. बाकी कुणाची कोणती गोष्ट ऐकत नसलो तरी बाबांची कुठलीच गोष्ट टाळली नाही. बाबांची एक सवय होती, सातच्या बातम्या ऐकण्याची. सातच्या बातम्या ते रोज बघत असत. बातम्यांन मध्ये दाखवायचे मंत्री संत्री, सेलिब्रेटी लोक चारचाकी ने यायचे. ते बघून मी म्हणायचो
"बाबा, मोठा झालो की मी पण अशीच चारचाकी घेणार"
"आणि बाकी कुणालाच नाही, फक्त तुम्हालाच बसू देईल"
चारचाकी गाडीच स्वप्न माझं लहानपणा पासूनच आहे.
बाबा शिक्षक होते तर बाबांची पेंशन यायची. बाबांच्या पेंशन ची तारीख जवळ आली की बाबा सांगत
"बँकेत जाऊन ये आणि साहेबाना विचार की पेंशन कधी येणार ते"
मग मी मस्त रमत-गंमत बँकेत जायचो. जसा लै मोठा झालोय आणि साहेबांना विचारायचो
"अहो काका, पेंशन आलीय का"
"नाही" .....काका
"कधी येणार आहे" .....मी
"येईल तीन चार दिवसात" .....काका
"बरं"
आणि मग घरी गेलो की बाबांचा पहिला प्रश्न
"गेला होता का बँकेत"
"हो पण ते साहेब ते काका म्हणले की तीन चार दिवसात येईल"
"ठीक आहे, तीन चार दिवसात परत जाऊन बघ"
"हो जाऊन येईल ना"
मग तीन चार दिवसांनी पुन्हा बँकेत जायचं. पुन्हा विचारायचं, आली असल्यास जेवणं खावणं करून बाबांसोबत बँकेत जायचं तिथं टोकन घेऊन बसायचं. आलेल्या गेलेल्या लोकांची गंमत बघायची बँकेतील शिवाजी महाराजांचा फोटो बघायचो. महाराजांचं नातं लहानपणापासूनच जवळच आहे. तेव्हा पासून ते अगदी आजही कधी बँकेत गेलो की तो फोटो पाच दहा मिनिटं बघत बसतो. तेवढ्यात आमचा नंबर लागायचा. कॅशियर ने आवाज दिला की बाबांना सांगायचं, बाबा पैसे घ्यायचे आणि आम्ही दोघे सोबत घराकडची वाट पकडत निघायचो. बाबांची पेंशन घेऊन येताना झालेला आनंद स्वतःचा पहिला पगार झाला तेव्हापण नव्हता झाला. घरी यायचो मम्मी पप्पांना आणि बाबांना सांगायचो सांगायचो मी पण बाबांसारखा मास्तर होईल
"का"
कारण नोकरी नंतर सुद्धा पैसे मिळतात म्हणून मग बाबा सांगत त्यासाठी अभ्यास करावा लागतो, शाळा शिकावी लागते. मग कुठं...
मग त्यावेळी वाटायचं "खर आहे, आपण पण अभ्यास केला पाहीजेल म्हणजे चांगली नोकरी मिळेल." पण आता सरकारने पेंशनच बंद केली. असो..
बाबांचं माझ्या कडे अजून एक काम असायचं जेवण झालं की पाय चेपणे. रोजच नाही कधी कधी. पण कंटाळा कधीच नाही आला. बाबा कधी नाही म्हटले तर मीच म्हणायचो
"बाबा, आज पाय चेपायचे नाहींयत का?"
मग पाय चेपता चेपता बाबा गोष्टी सांगत शाळेत काय शिकवलं. शाळेत सरांनी सांगितलेल्या गोष्टी सांगायला लावत. आणि या गोष्टीचा काय बोध निघाला हे पण सांगत. पाढे पाठ घेत, शब्दार्थ विचारत, वाकप्रचार काय असतं ते सांगत, त्याचा अर्थ, वाक्यात उपयोग, संदर्भासह स्पष्टीकरण.. असा माझा अभ्यास करवून घेत.
बाबा नेहमी म्हणत "भावेश, माझ्या घराण्याची शान वाढवणार आहे." ऐकून उगाचंच खूप मोठं झाल्यावाणी वाटायचं. मग बाबा म्हणत आहेत न मग आपण तसच वागायचं तेच करायचं शान वाढवायची, बाबांचं नाव काढायचं हाच अट्टाहास माझा अजून आहे. मला चित्र काढायला लहानपणा पासून आवडायचं. मी काढलेली चित्र आवर्जून, कौतुकाने बघत. घरी कुणी पाहुणे आले की त्यांना पण सांगत. शाळेत असताना मला नवनीत चित्रकला स्पर्धेत बक्षीस मिळालं होतं. बाबांना तेव्हा खूप आनंद झाला होता. कोणतीही गोष्ट असली की बाबांना सांगायचो. अभ्यासात अडचण आली की बाबांना सांगायचो. आणि बाबा प्रत्येक गोष्टीच समाधान कारक उत्तर देत असत. चार लोकांमध्ये कसं बसावं, कसं बोलावं, ओळखी, नाती गोती सांभाळणं असल्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. पुढं दहावीला 76% मार्क्स मिळाले तर सगळ्यांना कौतुकाने सांगत होते. मिळालेल्या मार्क्स पेक्षा मला बाबांनी केलेल्या कौतुकातच जास्त आनंद वाटायचा.
"मग आता पुढं काय करायचं ठरवलं तू" .....बाबा
"बारावी सायन्स करतो आधी" .....मी
"बरं ठीक आहे, चांगलं आहे" .....बाबा
पुढं बारांवी झाली सगळ्याची इच्छा होती डिप्लोमा किंवा इंजिनियरिंग करावी. पण मला ह्या असल्या कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट नव्हता. मला लहानपणा पासूनच चित्रकलेची आवड. यातच शिक्षण घ्यावं आणि करियर करावं अशी माझी प्रचंड इच्छा होती. सगळ्याचा विरोध असतांना सुद्धा मी या क्षेत्रामध्ये आलो. सगळ्यांचा विरोध असला तरी बाबांचा मला फुल्ल सपोर्ट होता. बाबा त्यांना सांगत "करू दे, तो जे करेल ते चांगलंच करेल माझा विश्वास आहे." बाबांच्या सपोर्ट मुळेच मी या क्षेत्रात आलो. कॉलेज सुरू झालं तेव्हा बाबा पलंगावरच पडून होते. त्यांच्या कमरेतले हाड तुटले होते. ते आता उठू बसू शकत नव्हते. चालू शकत नव्हते. कुणाच्यातरी मदतीने ते उठबस करू शकायचे. जेवण खावण, संडास, बाथरूम सगळं पलंगावरच. कारण पलंगावरून उतरुच शकत नव्हते. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या घरच्यांनी केल्यात. किळस आली तरी कधी दुर्लक्ष नाही झालं. कुठल्या गोष्टीची कमी नाही पडू दिली. एवढं सिरीयस असून सुद्धा बाबा रोज विचारायचे आज कॉलेज मध्ये काय शिकवलं. तू कोणतं नवीन चित्र काढलं. दिसत नसलं तरी पाच मिनिटं बघायचे. मीही सगळेच चित्र बाबांना दाखवायचो. स्पर्धेमध्ये हे चित्र पटवतोय बाबा, आज परीक्षा आहे, आज निकाल लागला, पास झालो. ह्या सगळ्या गोष्टी सांगायचो. माझ्यापेक्षा निकालाची जास्त उत्सुकता बाबांनाच असायची.
आणि एके दिवशी बाबा मला म्हणाले
"नुसतेच चित्र काढतो, त्याला काही बक्षीस मिळेल असं काहीतरी काढायला हवं तू."
"हो बाबा, काढेल ना अजून तर सुरवात आहे." .....मी
"काय सुरवात आहे, असं कुठं असतं का." .....बाबा
प्रथम वर्षाला मी बाबांच व्यक्तीचित्र काढलं. अर्थात तो विषय मला तेव्हा नव्हता. दोन काढले होते एक पेन्सिल स्केच आणि दुसरं वाटरकलर मध्ये. दोघेही बऱ्यापैकी झाले होते. म्हणजे मला आवडले होते. सगळ्यांनीच कौतुक केलं. बाबांनी पण..
कॉलेजला वार्षिक संमेलन होत माझ्या "14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी" आणि दरवर्षी वार्षिक संमेलनाला वार्षिक चित्रप्रदर्शन असतं. वर्षभरातील सगळे विद्यार्थ्यांचे चित्र त्या प्रदर्शनाला लावली जात. माझे पण काही चित्रे होती. त्यात बाबांचं ते वाटरकलर मध्ये मी केलेलं आयुष्यातलं पहिलं व्यक्तिचित्र पण होत. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारी 2014 ला बक्षीस वाटप म्हणजे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम होता. आणि योगायोग असा की माझ्या त्या व्यक्तिचित्राला पहिला नंबर आला. लै खुश झालो मी तर. घरी सगळ्यांना आवडलेलं चित्र त्याला प्रमाणपत्र मिळालं एक नंबरच ते तर अजून खुश होतील. मी तर खुश होतोच. आणि बाबा म्हटले होते "बक्षिसे मिळायला हवं असं चित्र काढ" आणि त्याच्याच चित्राला बक्षीस मिळालं. खूप आनंद होईल ऐकून बाबांना. मला तर कधी कॉलेज मधून घरी जातो आणि हे प्रमाणपत्र बाबांना दाखवतो आणि सांगतो असं झालं. तेवढ्यात पप्पांचा फोन पण आला होता. कुठं आहे, कितीवेळ लागेल पटकन घरी ये म्हणून.
आनंदाच्या ओघात हसत खेळत घरी यायला निघालो होतो. गाडीला थोडा अर्धातास उशीर होता. रस्त्यात होतो तोवर गावाकडून मित्राचा फोन आला.
"हॅलो, भावेश"
"हा बोल रे"
"तुला काही कळालं का"
"सलं रे"
"घरून फोन नाही आला"
"आला होता, पण घरी ये एवढंच म्हटले"
"अरे, बाबा वारले रे तुझे आताच..!"
एवढं ऐकून त्याच्याशी पुढं काय बोलावं याच भान नव्हतं मला. पाया खालची जमीन हल्ली माझ्या. फोन कट करून निःशब्द होऊन जागेवर स्तब्ध तसाच उभा राहिलो. डोळ्यात आसवांनी गर्दी करायला सुरुवात केली. पाणावलेले डोळे, आजूबाजूला काय चाललंय सगळं विसरलो मी. डोक्यात सगळे विचाराचे थैमान माजले. बाबांचं आवाज.. बक्षीस.. पेंटिंग.. अवार्ड.. प्रमाणपत्र.. आणि बाबांचा मृत्यू.. हे सगळं खोटं असलं असतं तर फार बरं झालं असतं. सोबतच्या मित्राने दिलेल्या आवाजाने मी भानावर आलो. हळुवार पावले टाकत स्टेशनवर आलो. घरी जायची अजिबात इच्छा नव्हती.. आणि त्या अगोदरच्या रात्री मला जवळ बोलावल होत. त्यांना काहीतरी सांगायचं होत मला. पण बोलता येत नव्हतं. काय सांगत असतील ते.. अजून ही हा विचार बऱ्याच वेळा येतो. सगळ्या गोष्टी अचानक घडून गेल्यात मला काय करावं अजून सुचत नाहीय. आता बाबा सोबत नाहीयत बाबांची फक्त आठवण सोबत आहे..
मी नोकरीला लागलो शाळेत तेव्हा वाटायचं आता बाबा असते तर.. डिग्री पास आऊट झालो आता बाबा असते तर.. आता सर्व काही त्याच्या मनासारखं करतोय.. होतंय.. आता बाबा असते तर..
आता बाबा नाहीयेत पण ते आठवणीतुन कायम स्मरणात आहेत. त्याचा आशीर्वाद आहेच.. पण खंत एकच आहे मनी.. आता बाबा नाहींयत...