Sunday, August 11, 2019

खान्देशचा इतिहास, अहिराणी भाषा आणि कानबाई

खान्देशचा इतिहास, अहिराणी भाषा  आणि कानबाई

   प्रत्येक भाषेच्या अंतर्गत अनेक बोलीभाषा आहेत. या प्रत्येक बोलींना भाषेचेच रूप आहे. यामुळे सम्पूर्ण महाराष्ट्रात दर 15 ते 20 किमी पर्यंत भाषा बदलत जाते. वर्हाडी, नागपुरी, कोल्हापुरी, कोकणी, अग्री, कोळी अशा एक ना अनेक बोली भाषा सम्पूर्ण महाराष्ट्राच्या मातीत प्रत्येक भागात बोलल्या जातात. यासगळ्या बोली भाषा आहेत यातल्या यात पण अजून काही या बोली भाषेचे उपप्रकार आहेत. खान्देशात बोलली जाणारी ही बोली ही एक इथली महत्वाची बोली भाषा आहे. यात पण थोड्या प्रमाणात उपप्रकार आहेतच. इतर भाषीय लोकांना बोलायला, समजायला, कळायला थोडी अवघड ही अहिराणी भाषा आहे. या अहिराणी बोलीत गीत, ओव्या आणि काव्य यात झालेले सामाजिक चित्रण इथल्या समाजाचे चित्रच डोळ्या समोर उभं करत. आपल्या भावनांना नकळत आकार देतात. सण, उत्सव, यात्रा, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, कुटुंबातील नाते, गाव गाडे, मंदिरे सर्वच या बोलीत प्रकट होतात. एवढे असूनहू या भाषेतील काव्य ग्रंथ, साहित्य, फारसे प्रकाश श्रोतात नाहीत. आणि जे काही आहेत ते अद्याप हवे तसे, समाजाच्या समोर आलेले नाहीत, प्रत्येक खान्देशी माणसाचे भाषेवर अमाप प्रेम आहे. पण तरीही यातल्या काही लोकांना अहिराणी बोलण्याची, ऐकण्याची कोण लाज वाटते काय माहिती. पण काही लोक मात्र नित्याने ही भाषा बोलतात. तिचा आदर सन्मान करतात, गर्व आहे अश्या खान्देशी माझ्या मित्र, भाऊ, काक, मामा यांचा, तेवढाच हेवा ही वाटतो.
खान्देशचा नकाशा
इ. स. पूर्व १ ते २ शतकापासून ख्रिस्ती शतकाच्या सुरवातीपर्यंत खान्देश बौद्धधर्मीय राजाच्या छत्राखाली होता. खान्देशचा प्राचीन इतिहास 'तोरणमाळ' व 'अशिरगड' या दोन डोंगरी किल्यांशी निगडित आहे. ४व्या शतकाच्या उत्तरार्धात नाशिक येथे 'विरसेन' नावाचा अहिर राजा राज्य करीत असल्याची नोंद आहे. त्यामुळे या भागात 'अहिर' संस्कृतीची पालेमुळे रुजली. इ. स. १००० ते १२०० या काळात अशिरगडचा परमार वंशीय 'तक' आडनावाच्या राजपूत राजाने व पूढे 'पाटण' येथील निकुंभ वंशीय राजाचे येथे राज्य होते. हा राजा शिवभक्त होता. निकुंभ वंशीय 'सोनाळदेव' राजाच्या कारकिर्दीत इ. स. १२०६ मध्ये भागरे येथील जैन गुहा, मनमाड जवळील 'अंकाई' डोंगरातील जैन गुहा व चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथे 'ब्राम्हण गुहा' खोदली गेली. १३व्या शतकात अशिरगडच्या राजाचा पराभव करून चौहान राजे खान्देशावर राज्य करू लागले ते स्वतःस खान्देशचे राजे म्हणून घेत. देवगिरीकट स्वारी करून अल्लाउद्दीन खिलजीने सन १२२९ मध्ये खान्देशची लूट केली व चौहान घराण्याचा नायनाट केला. १३२३ पासूनच खान्देशवर महंमद तुलघल यांचे वर्चस्व होते. इ.स.१३७० ते १३९९ साली दिल्लीचा बादशहा फिरोजशहा तुघलघ याने मालिकराज फरुकी याला खान्देशचा सेनापती नेमले.
माळव्याचा राजा दिलावरखान याच्या मुलीशी मालिक अहमद उर्फ मलिक राजा याचा मुलगा मलीनसर यांचे लग्न झाले. यामुळे खान्देशात मलीक राजाचे वर्चस्व वाढीस लागले. मालिकने अशिरगडच्या राजाला फसवून ताब्यात घेतला. थाळनेर ता.शिरपूर जि.धुळे जिंकले आणि सुलतानपुरावर स्वारी केली. गुजरातच्या अहमद राजाने त्याला खान ही पदवी बहाल केली. यानंतर मिरान, आदिलखान, मिरान मुबादिक, आदिलखान, दाऊदखान, गझनीखान, दुसरा आदिलखान, मुबरीक खान, दुसरा मिरान मुहम्मद, राजा अलिखान अशा अनेक प्रमुखांनी खान्देशच्या प्रदेशावर १५व्या शतकापर्यंत राज्य केले. याच बरोबर इ.स.१४१७ मध्ये फरुकी राजाच्या (खान्देशचा राजा) मलीक नासीर या दुसऱ्या मुलास खान ही पदवी गुजरातच्या पहिला अहमद या राजाने दिली. अबुल फजलच्या 'पेने अकबरी' प्रमाणे खान्देश म्हणजे खाजाचा देश अशी उपपत्ती आहे. परंतु ज्या अर्थी फेरीस्तानेही आपल्या वर्णनात खान्देशचा उल्लेख केलेला आहे त्या अर्धी हे नाव त्यापूर्वीचे जुने ही असावे.
'मिसिक्लेर' च्या नावाने एक इतिहास संशोधक श्री.के.बी.मराठे व मिस्टर विल्सन यांच्या मते खान्देश हे नाव 'खांडव वन' यावरून आले असावे. महाभारतात 'तोरण माळ' (धुळे जिल्हा) च्या राजाशी पांडवाचे युद्ध झाल्याचा उल्लेख आहे.अर्जुनाने पांडव वन जाणून ही भूमी लागवडीस व वसाहतीस योग्य अशी केली, खान्देशच्या उत्पत्तीवर मात्र अभ्यासकांचे अजूनतरी एकमत नाहीये.
जळगांव व धुळे हे दोघे जिल्हे पूर्वी एकच होते, यालाच खान्देश असे नाव होते. सन १९०६ साली त्याचे दोन विभाग करण्यात आले. पूर्व खान्देश(जळगांव) व पश्चिम खान्देश(धुळे) अशी नावे त्यांना देण्यात आली. महाराष्ट्र राज्य निर्मिती नंतर पूर्व खान्देश याला जळगांव व पश्चिम खान्देश याला धुळे अशी नावे देण्यात आली.
खान्देश हे नाव अहिराणी भाषिक प्रदेशाला कसे मिळाले यावर दुमत असले तरी रामायणाच्या काळात हा भाग 'कृषिक' या नावाने उल्लेखिला आहे. खान्देशात पूर्वी अभिर लोकांची वस्ती होती. अहिर हे शक कुशाणाप्रमाणे परकीय आहेत. व ते भारताबाहेरून भारतात आले. आभीर पासून अहिर या शब्दाची उत्पत्ती झाली असे अभ्यासकांचे मत आहे. अहिर हे यदुवंशीय आर्य असावेत. कारण ते कृष्णाची पूजा करीत कन्हेर म्हणजे कृष्ण, कन्हेरदेश म्हणजे खान्देश कानबाईचा उत्सव फक्त खान्देशातच साजरा करतात. म्हणून काही अभ्यासक हे मत ग्राह्य धरतात.
खान्देशातील राजाला मुलगा झाला म्हणून त्याने सध्या राज्यला पुरणपोळीचे निमंत्रण दिले त्याला खानभाईचे रोट म्हणत यातूनच पुढं कानबाई व रानबाईचे रोट ही परंपरा चालत आली. असही काही जुनी गावकरी सांगत असतात. एकूणच एकमत नाहीच आहे. अधिक काही माहिती सामोरी आलीच तर पुन्हा लिहून तुमच्यापर्यंत पोहचवली जाईल.

खान्देशातील कानबाई

No comments:

Post a Comment

ह्या ब्लॉगवर काही आवडले असल्यास कमेंट करून मला नक्की कळवा .